मुंबई येथे पोलिसांना व पत्रकारांना कोरोना झाला आहे, त्या भीतीने मुंबई येथील कुलाबा पोलीस ठाण्या कार्यरत असलेल्या शीतल शिवाजी खराडे या महिला पोलीसानं कोरोनाच्या धास्तीनं चक्क सांगलीतील तासगाव इथं स्वतःच घर गाठलं. या घटनेनंतर लॉकडाऊनच्या यंत्रणेवरच प्रश्नचिन्हं उभ ठाकलंय. पोलिसांनी या महिला पोलिस कर्मचा-याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र, कुठल्या वाहनातून ही कर्मचारी तासगावपर्यंत पोहोचली हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
यासंदर्भात तासगाव पोलीस ठाण्याकडून अधिक माहिती मिळाली ती अशी की, सदर महिला पोलीस कर्मचारी वृंदावन कॉलनी येथे आपल्या आई वडिलांकडे राहते. परवा ती कामावर रुजू असताना तासगावमध्ये पोहोचली. परंतु तासगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे त्यांना माहिती मिळाली की वृंदावन कॉलनी येथे महिला पोलीस कर्मचारी मुंबईवरून आली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी तात्काळ तासगाव येथील वृंदावन कॉलनीत धाव घेतली. व कसून चौकशी केली तर ती महिला पोलिस कर्मचारी भयभीत झाली होती. त्यानुसार तासगाव पोलीसांनी शीतल शिवाजी खराडे या महिला पोलीस कर्मचाऱ्या विरोधात कलम 269,188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तासगाव पोलिसांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर मिरज येथे इन्स्टिट्यूशनल क्वांरटाईन करण्यात आले आहे,
तासगाव पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर महिला पोलीस कर्मचारी मुंबईला फळभाज्या व द्राक्ष घेऊन जाणाऱ्या टेम्पो मधून आली असल्याचे सांगितले आहे. सदर टेम्पोला अत्यावश्यक सेवेचा पास असल्याचेही सांगितलं जाते.
तासगाव तालुक्यातून मुंबईकडे द्राक्ष व फळभाज्या घेऊन टेम्पो व ट्रक जातात. परंतु सदर वाहनाचे चालक हे येताना प्रवासी घेऊन येतात त्या प्रवाशांकडून प्रत्येकी 3 हजार रुपये घेतात. असे स्थानिक टेम्पोचालक सांगतात.
तासगावच्या पूर्व भागात मुंबईवरून खूप रहिवाशी आले आहेत. त्या रहिवाश्याकडून ही टेम्पो चालक हे प्रत्येकी 3 हजार रुपये घेऊन तासगावमध्ये सोडतात. बाब किरकोळ आहे, परंतु गंभीर आहे.
एखादा कोरूना ग्रस्त पेशंट तासगाव तालुका मध्ये दाखल झाला तर प्रशासन यंत्रणा वर प्रचंड ताण येणार आहे. त्यामुळे तासगाव पोलिसांनी आत्ताच सावध भूमिका घेतली पाहिजे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
वास्तविक, मुंबई मधून गाड्या मोकळ्या रिकाम्या येत असताना टोल नाक्यावर किंवा मुंबई ते पुणे, पुणे ते कराड, या मेगा हायवेवर कित्येक ठिकाणी पोलीस थांबून आहेत पण ते पोलिस कारवाई का करत नाहीत हा प्रश्न मोठा आहे.