पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे विठुरायाला साकडं घातलं.
मुख्यमंत्र्यासोबत विठ्ठल मंदिरात सहा वर्षे सेवा करणाऱ्या बडे दाम्पत्याला यावर्षी महापूजेचा मान मिळाला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली. तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित होते.
आपण सगळे जणं माऊलीचे भक्त म्हणून इथे जमलेलो आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही ना कोणी अधिकारी, माऊलीच्या समोर सगळे सारखेच. मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल हा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे. आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला साकडं घातलं.त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं हे साकडं विठुरायाने ऐकावं व देश कोरोनामुक्त व्हावा अशीच भावना सर्व वारकऱ्यामध्ये आहे.