बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सून वाटचालीस पोषक ठरत आहे. गुरूवारी मोठी मजल मारणाऱ्या वाऱ्यांनी आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, तेलंगणा, दक्षिण ओडीशा, बंगालच्या उपसागरात प्रगती केली आहे. तर ईशान्य भारतातून पुढे चाल करत, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही राज्ये संपुर्णपणे व्यापून, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयाच्या काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान बुधवारी बंगालच्या उपसागरात वाऱ्यांनी प्रगती केली. त्रिपुरा आणि मिझोरामधील आगरतळा, कोहीमापर्यंत मॉन्सून दाखल झाला होता. मात्र अरबी समुद्रातील वाटचाल पाहता बुधवारी मॉन्सूनने संपुर्ण तामिळनाडू राज्य व्यापले होते. दुसऱ्याच दिवशी गुरूवारी अरबी समुद्रावरून मोठा टप्पा पार करून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.