मुंबई – ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे. १४ एप्रिलनंतर काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. काही प्रमाणात ढिलाई देता येईल का? याबाबत विचार सुरू आहे. असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे २५ हजार पीपीई कीट्स, दीड हजार व्हेंटीलेटर असून अडीच लाख ९५ मास्क उपलब्ध आहेत. राज्यात लवकरच नविन व्हेंटीलेटर उपलब्ध होणार असून आवश्यकता भासल्यास केंद्र शासनाकडून उपकरणांचा पुरवठा राज्याला केला जाणार आहे.
राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेतून सर्वेक्षणाबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ९ लाख लोकांचं ट्रेसिंग करण्यात आले आहे. याकामासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचऱ्यांना सहकार्य करा, मदत करा असं आवाहन टोपे यांनी राज्यातील जनतेला केलं.
तसेच नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवी यासाठी योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप यासोबतच ‘क’जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा. सोबतच नागरिकांनी स्वयंशीस्त पाळावी व घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे.