पुण्यात उद्यापासून पाणीकपात; टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही

पुण्यात उद्यापासून पाणीकपात; टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.
पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच पाणी बचतीसाठी टँकर केंद्रही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे टँकरद्वारेही पाणी मिळणार नसल्याने लाखो नागरिकांना ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, यापूर्वी जेंव्हा-जेंव्हा शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात आला आहे, तेंव्हा पुढील काही दिवस काही भागांना विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, दर गुरुवारी बंद ठेवल्यास एका महिन्यात ०.२५ अब्ज घनफूट पाण्याची बचत होते. त्यानुसार पंधरा टक्क्यांपर्यंत पाणीकपात असेल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

शहराला खडकवासला साखळी प्रकल्पातील वरसगांव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणात केवळ ८.८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यातच ग्रामीण भागासाठी सिंचनाचे आवर्तनही सुरू ठेवण्यात आले आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान विभागाचा अंदाज आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून उद्यापासून (१८ मे) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दररोज १ हजार ४०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणातून उचलण्यात येते. महापालिका हद्दीत नव्याने २३ गावांचा समावेश झाल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. प्रतिदिन १ हजार ४०० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत असतानाही शहराच्या अनेक भागात सध्या विस्कळीत, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी महापालिका प्रशासनाकडे येत आहेत. बाणेर, बालेवाडी या भागातील अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून हडपसर, महंमदवाडी, उरूळी देवाची, फुरसुंगी या गावे पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीतही वाढ झाल्याने टँकरच्या फेऱ्यांमध्येही सहा हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागात सध्या पाणीटंचाई जाणवत असून या परिस्थिती गुरुवारपासून आणखी तीव्र होणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामांसाठी यापूर्वी अनेकदा गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तेंव्हा दुसऱ्या दिवशी अनेक भागांना पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या भागाला पाणी मिळते तेथे अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. वितरणातील दोषामुळे ही परिस्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम असते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे पुढील काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे, हे स्पष्ट होत आहे.

प्रशासनाची उपाययोजना
पाणीकपातीच्या निर्णयानुसार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व भागाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंत्यांना विभागनिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तांत्रिक कारणे तातडीने शोधून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना कनिष्ठ अभियंत्यांना करण्यात आली आहे. कोंढव्यातील टिळेकरनगर परिसर, येरवडा, बिबवेवाडीचा काही भाग, हडपसर यासह इतर भागात २० एअर वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. त्यातून हवा बाहेर पडून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा दावा करण्यात आला आहे.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook